मतदारांत ३० हजारांची घट

पालघर जिल्ह्यातील दुबार मतदार नोंदी तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणात वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजारांनी कमी झाली आहे.

0

पालघर जिल्ह्यात २० लाख १३ हजार ६५५ मतदार

पालघर : पालघर जिल्ह्यातील दुबार मतदार नोंदी तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणात वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजारांनी कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या २० लाख १३ हजार ६५५ मतदार संख्या निश्चित झाली असून ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत ६२ हजारांनी अधिक आहे. १० जानेवारी २०२० रोजी घोषित झालेल्या मतदार संख्येनुसार पालघर जिल्ह्यात दहा लाख ५६ हजार ८१० पुरुष मतदार, ९ लाख ५६ हजार ६६७ महिला मतदार तर १६८ तृतीयपंथी मतदार आहेत. १५ जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजार ६३४ने कमी झाली असून नालासोपारा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५४ हजार ५३६ मतदार कमी झाले आहेत. याचबरोबरीने विक्रमगड विधानसभा क्षेत्रात १२०७३ मतदार वाढले असून डहाणू विधानसभा क्षेत्रात ५४४०, वसई विधानसभा क्षेत्रात ३८९०, बोईसर विधानसभा क्षेत्रात १६६४ तर पालघर विधानसभा क्षेत्रात ८३५ मतदार वाढले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरुष मतदार संख्या १९०३५ने कमी झाली असून महिला मतदार संख्या अकरा हजार ६४९ ने कमी झाली आहे. मात्र तृतीयपंथी मतदार संख्या ५०ने वाढली असून त्यापैकी ४३ तृतीयपंथीयांची नालासोपारा मतदारसंघात नव्याने नोंद झाली आहे. जानेवारी २०२०च्या मतदार यादीमध्ये एक लाख २१ हजार ४८१ मतदारांची छायाचित्रे नसल्याचे आढळून आले होते. मतदारांना छायाचित्र सादर करण्यासाठी १ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत मतदारांचा पुनर्निरीक्षणासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. त्या वेळी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन मतदारांची छायाचित्रे संकलित केली. तसेच प्रत्यक्ष राहात असलेल्या मतदारांसंदर्भात तेथील स्थानिक रहिवाशांच्या जाबजबाब नोंदविण्यात आहे होते. वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, मतदार यादीत छायाचित्र नसलेली किंवा तपासणीदरम्यान आढळून न आलेल्यांमध्ये नालासोपारा येथील सर्वाधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

मतदार संख्येत घट कशामुळे?

गेल्या चार-पाच वर्षांपासून ऑनलाइन मतदार नोंदणी पद्धत कार्यरत झाल्यानंतर मतदार संख्या झपाटय़ाने वाढली होती. अनेक ठिकाणी बोगस मतदार नोंदी झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दुबार नावे तसेच छायाचित्र नसलेली मतदार नावे वगळण्यात आली. नव्याने मतदार नोंदणी करताना प्रशासन अधिक दक्षता घेत असल्याने वर्षभरात वगळलेल्या नावांच्या तुलनेत नवीन झालेल्या मतदार नोंदणी कमी आहे. त्यामुळे नालासोपारा वगळता इतर विधानसभा क्षेत्रातदेखील मतदार संख्या वाढ माफक प्रमाणात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.