शहरबात : वाडा-भिवंडी महामार्गाला वाली कोण?
वाडा-भिवंडी या राज्य महामार्गाची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे.
वाडा-भिवंडी या राज्य महामार्गाची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील हजारोंच्या संख्येने असलेल्या खड्डय़ांमुळे नेहमीच अपघात होत असून गेल्या पाच वर्षांत शंभरपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. या महामार्गावर याच कालावधीत १० कोटी रुपयांचा खर्च खड्डे भरण्यासाठी करुनही या महामार्गाची दुरवस्था कायम आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या महामार्गाला कोण वाली आहे का? असा संतप्त सवाल येथील जनतेकडून शासनाला व प्रशासकीय यंत्रणेला विचारला जात आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर भिवंडी-वाडा-मनोर या ६३ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम सन २००५ मध्ये सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या पायाभरणीचे काम येथील काही स्थानिक ठेकेदार, तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांना पोट ठेकेदार म्हणून दिले. महामार्गाच्या कामाचा आवश्यक अनुभव नसलेल्या या पोटठेकेदारांनी या महामार्गाच्या पायाभरणीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वसई येथील उपअभियंता, शाखा अभियंता हे कधी या कामाकडे फिरकलेच नाहीत.