सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील पहिला बोगदा पूर्ण

0

मंबई :सागरी किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराच्या एका बोगद्याचे खणन काम सोमवारी पूर्ण झाले. या कामाचे यश पालिकेने समारंभपूर्वक साजरे केले. नऊ महिन्यात या बोगद्याचे खणन पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र टाळेबंदीमुळे संथ गतीने झालेले हे काम अखेर एक वर्षांने पूर्ण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गातर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहेत. त्यापैकी मरिन ड्राइव्हकडे जाणारय़ा वाहतुकीसाठी वापरात येणारय़ा पहिल्या बोगद्याचे खणन सोमवारी पूर्ण झाले. गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आला. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला.

त्याप्रसंगी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. ते यावेळी म्हणाले की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असेही ते म्हणाले.

पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक खासदार अरिवद सावंत, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे यावेळी सहभागी झाले होते.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेल्या वर्षी  ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. चहल यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.