“एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं”, बंडखोर आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले “सकाळी ८.३० वाजता…”
नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका असं उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितलं होतं, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे मनमाड दौऱ्यावर असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर राजीनामा देण्यास तयार आहोत असंही म्हटलं आहे.
“एकनाथ शिंदेना सुरक्षा न देण्याचा आदेश”
“ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी ८.३० वाजता शंभूराज देसाई यांना फोन करुन एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं,” असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.