यवतमाळ : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन ; नागरिकांमध्ये पुराची भीती
बहुतांश भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बहुतांश भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये पुराची धडकी भरली आहे. आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजतापासून यवतमाळ शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अनेक कुटुंब अद्यापही निवारागृहात –
गेल्या आठवड्यात रविवार ते मंगळवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे यवतमाळ, राळेगाव, वणी, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवसांत जिल्ह्यातील ५६२ कुटुंबातील दोन हजार २४७ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. यातील अनेक कुटुंब अद्यापही निवारागृहात आहेत.